आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा; १४ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक गडचिरोली, ता. १० : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांनी आश्रमशाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता नवीन ‘एसओपी’ (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) निश्चित करण्यात येणार असल्याची घोषणा ॲड. जयस्वाल यांनी केली. येत्या १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत विविध समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नवीन एसओपी तयार केली जाईल, असे त्यांनी सांगितले. जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्री सर्पदंश झाल्यानंतर तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून, गंभीर प्रकृती असलेल्या दीपिका मडावी हिला प्रशासनाने एअरलिफ्ट करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल, छाया कुंभारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक कुटुंबाला १० लाखांची मदत प्रस्तावित मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून, त्यापैकी एक लाख रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त पाच लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाला एकूण १० लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय इतर शासकीय योजनांमधूनही आवश्यक आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.